Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 3:07 PM | 1 comment

​संभाजी राजे

संभाजी राजे... हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. धर्मवीर, रणधुरंधर, सिंहाचा छावा, कर्तव्यदक्ष अश्या उपमांची रत्न साहित्याच्या खजिन्यातून रिती केली तरी शंभू राजांच्या किर्तीच्या तराजूत त्यांचे वजन तूसभरही भरणार नाही. त्यांची किर्ती त्याही पेक्षा वर आहे.

छत्रपती संभाजी राजे

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...’ त्याप्रमाणेच शंभू राजे लहानपनापासून अतिशय हुशार, तल्लख बुद्धी आणि आरसपाणी सौंदर्यांचे दैवी वरदान लाभलेले. अंगमेहनतीच्या जोरावर शंभू राजांनी उत्तम शरीरयष्टी देखील कमावली होती. पुरंदराच्या तहानुसार जेव्हा शिवाजी महाराजांना आग्र्याला जाणे भाग होते, तेव्हा वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षांच्या शंभूराजांनाही आग्र्याला जावे लागले. महाराजांच्या अनुपस्थितीत बाळ शंभू राजे औरंगजेबाच्या दरबारात उपस्थिती लावत होते. नेतृत्व, राजकारणांतील बारकावे, रणांगणातील डावपेच, कमालीची हुशारी आणि मुत्सद्दीपणा शंभूराजांकडे असल्यामुळे दरबारात त्यांच्याशी चर्चा करताना भल्याभल्यांच्या नाकी नऊ येत असे.

शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर अवघ्या तेविस-चोविस वर्षांच्या शंभू राजांनी स्वराज्याची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. कौटुंबिक कलह, अष्ट्प्रधान मंडळीतील अनेकांची स्वराज्यद्रोहाची बंडाळी आणि परकीय शत्रूंच्या वाढत्या हालचालींना शंभू राजांनी आपल्या बाहूंच्या जोरावर रोखून धरले. आपल्या अल्पशा मावळ्यांना त्यांनी वानर सेनासागराप्रमणे तयार केले होते. गोव्याचे पोर्तुगीज, म्हैसूरचा चिक्कदेवराय राजा आणि जंजीर्‍याच्या सिद्धी बंधूंनादे माय धरणी ठाय’ करुन सोडल्यामुळे शंभू राजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याचे धाडस कोणातही झाले नाही. पातशहा औरंगजेब त्याच्या पाच लाख फौजेनिशी महाराष्ट्रावर चालून आल्यावर त्याच्याशी सलग आठ वर्षे राजांनी कडवी झुंज दिली, पण शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपुर्ण किल्ला (गड) किंवा आपल्या आरमारतील एकही जहाज शंभूराजांनी गमावले नाही.

प्रभू श्रीरामचंद्रांसारखा, जंजीरा जिंकण्यासाठी संभाजी राजे आणि त्यांच्या मावळ्यांनी बांधलेला सेतू

शंभू राजांची फक्त तलवारच सप् सप् चालायची नाही तर त्यांची लेखाणीही अतिशय धारदार होती. एक पराक्रमी सेनानी आणि विचारी कवी ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे शंभू राजे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शंभू राजांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. नखशिख, नायिकाभेद आणि सातशातक ही ग्रंथसंपदा सुद्धा संस्कृत आणि ब्रज भाषेवर ही प्रभुत्व असलेल्या शंभूराजांचीच.

संगमेश्वर येथे एक बैठकी दरम्यानं संभाजी राजांचा मेहुणे गणोजी शिर्के ह्याच्या बंडाळीमुळे संभाजीराजे व त्यांचे परममित्र कवी कलश औरंगजेबाच्या कैदेत सापडले. औरंगजेबाने शंभूराजांना सर्व किल्ले स्वतःच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले असतानाही शंभू राजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांची मरतुकड्या उंटावरुन विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली परंतु शंभू राजांनी शरणागती पत्करली नाही. औरंगजेबाने क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिल्यामुळे जवळपास ४० दिवसांपर्यंत राजांना असह्य वेदना देण्यात आल्या पण राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. शंभू राजे आणि कवी कलश दोघांचेही डोळे तप्त लाल सळीने फोडले गेले. शंभू राजांची कातडी सोलून, हाल-हाल करुन मारण्यात आले. राजांना न्यायला आलेला मृत्यू देखील ओशाळला पण राजांनी त्यांची तत्वं अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही.

एका रणधुरंधर सेनानीचा वध झाला, पण गप्प राहतील ते मावळे कसले. महाराष्ट्रासह दक्षिण भारत जिंकायला आलेल्या औरंगजेबाला शंभू राजांच्या एकनिष्ठ धनाजी आणि संताजी घोरपडे आणि इतर मावळ्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्येच गाडले. आणि स्वराज्याचे भगवे झेंडे अटकेपार रोवले. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि त्यावर कळस चढवायचे काम संभाजी राजे आणि पेशव्यांनी केले.

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...

स्वराज्यरक्षणाची आग मावळ्यांमधे सतत धगधगत ठेवणार्‍या स्वराज्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा...


Reference - 

Sambhaji Book by Vishwas Patil
Internet
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:05 PM | No comments

गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिप्रदा म्हणजे ‘गुढीपाडवा’ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नव-संवत्सराचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहीला-वहीला दिवस आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त. पुराणात आणि आपल्या हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्त सांगितले आहेत.
 
१. अक्षय तृतीया
२. विजयादशमी (दसरा)
३. गुढीपाडवा हे तीन मुहूर्त आणि,
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त
 
कोणतेही पवित्र कार्य करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. "चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी करावी..." हे बहुदा यासाठीच म्हटले जात असावे. अनेक जण या गुढीपाडव्याचा पवित्र दिवशी शुभ संकल्प करतात. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान आटपून घरोघरी, दारात उंच गुढी उभारुन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. आता आपण ही गुढी उभारण्यामागच्या कारणाविषयी जाणून घेऊ.

ब्रम्हदेव, ज्याने अखिल सृष्टीची निर्मिती केली, त्यांनी ह्या चैत्र शुद्ध प्रतिप्रदेदिवशी सृष्टीरचनेस आरंभ केला असे मानले जाते. याच दिवशी रघुकुलनायक प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधिपती दृष्ट रावणाचा आणि इतर राक्षसांचा बिमोड करुन, त्यांना मारुन आणि वनवास संपवून पुन्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला. समस्त अयोध्यावासियांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत दारात ‘गुढ्या’, ‘तोरणं’ ऊभारुन आणि ‘रांगोळ्या’ काढून केले.

गौतमीपुत्र शातकर्णी उर्फ
शालिवाहन याने ह्या दिवशी ‘शक’ राजांचा युद्धात पराभव केला होता. या शालिवाहन राजाच्या काळात नवीन कालगणनेला सुरुवात झाली, ही कालगणना ‘शालिवाहन शक’ म्हणून ओळखली जाते. ह्या दिवसापासून ‘चैत्र नवरात्रीला’ सुरुवात होते. नवरात्रीत अनेक जण घरी घट बसवितात. या नवरात्रीमध्ये आदिमाता महिषासुरमर्दिनीची उपासना आणि पूजन करणे श्रेष्ठ मानले जाते. ‘रामनवमीला’ रामजन्म उत्सव साजरा केला जातो आणि सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. रामनवमीला अशुभाच्या नाशासाठी, आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या आशिर्वादाने माता कौसल्येच्या पोटी प्रभू ‘श्रीरामचंद्रांनी’ जन्म घेतला, ही नवरात्री ‘शुभंकरा नवरात्री’ म्हणून देखील ओळखली जाते. नववर्षाच्या सुरुवातीला ह्या तीनही सणांच्या त्रिवेणी संगमाने एक वेगळेच चैतन्य सकल सृष्टीत येते. वसंत ऋतूची चाहूल चैत्राच्या नवपालवीत अधिकाधिक भर टाकत असते. जणू सर्व निसर्गच नववर्षाचे स्वागत करायला नवीन वस्त्रे परिधान करुन तयार असतो.
गुढी
गुढी आणि पंचांग पूजन
गुढी म्हणजे ‘मांगल्याचे’, ‘विजयाचे’ आणि ‘आनंदाचे’ प्रतिक. गुढी उभारताना, एका उंच काठीच्या टोकाला स्वच्छ रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावर कडुलिंब आणि आंब्याची डहाळी बांधून त्यावर ‘तांब्या’ किंवा ‘चांदीचा’ गडू (कलश) उपडी ठेवला जातो. त्या गडूवर, कुंकवाने ‘ॐ’ किंवा ‘स्वस्तिक’ हे मंगल चिन्ह काढून गुढीला साखरेच्या गाठींची माळा आणि फुलांचा हार घातला जातो. त्यानंतर गुढी उभारायची जागा स्वच्छ करुन उंच गुढी उभारली जाते. मग हळद कुंकू, अक्षता व फुले वाहून गुढीची मनोभावे पुजा करण्यात येते व गुढी समोर दिवा ठेवून गुढीला नैवेद्य अर्पण केला जातो. आपली तसेच आपल्या प्रियजनांची भरभराट होऊन, त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुढी सारखे उत्तुंग यश मिळावे म्हणून साकडे घातले जाते. नंतर कडुलिंबाच्या पानांचा रसतीर्थ’ म्हणून प्राशन केला जातो. घरोघरी पंचपक्वानांचा बेत करुन देवाला गोड-धोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो.

शोभायात्रा - ढोल ताशा पथकं
जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक
गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने हा दिवस नवीन वस्तू, सुवर्ण खरेदी आणि नवीन कामकाज वा उद्योग सुरु करण्यासाठी खुप चांगला मानला जातो. गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी हिंदू संस्कृतीची जपणूक म्हणून शोभायात्रा काढल्या जातात. लेझीम, झांज, ध्वजपथकं ढोल ताशांच्या तालावर पावलं थिरकताना तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. लहान थोर सर्व जण पारंपारिक वेषात या शोभायात्रेत उत्साहाने सामिल होतात तर काही जण शिवाजीराजे, झाशीची राणी अशा अनेक शूर-वीरांचे पोशाख परिधान करुन यात्रेची शोभा वाढवीत असतात. तलवारबाजी, दांड्पट्टा, लाठीकाठी अश्या अनेक जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक या शोभायात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

शोभायात्रेत नटलेली मंडळी - १
शोभायात्रेत नटलेली मंडळी -
गुढीपाडवा सण हिंदू वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात, उत्साहात करुन देतो आणि संपूर्ण वर्ष आनंद साजरा करायला अनेक सण आणि उत्सवांची खैरात घेऊन योतो. आपण या प्रत्येकाने या सण आणि उत्सवात प्रेमाने सहभाग घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीची आणि मुल्यांची जपणूक केलीच पाहीजे.