Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:05 PM | No comments

गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिप्रदा म्हणजे ‘गुढीपाडवा’ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नव-संवत्सराचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहीला-वहीला दिवस आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त. पुराणात आणि आपल्या हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्त सांगितले आहेत.
 
१. अक्षय तृतीया
२. विजयादशमी (दसरा)
३. गुढीपाडवा हे तीन मुहूर्त आणि,
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त
 
कोणतेही पवित्र कार्य करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. "चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी करावी..." हे बहुदा यासाठीच म्हटले जात असावे. अनेक जण या गुढीपाडव्याचा पवित्र दिवशी शुभ संकल्प करतात. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान आटपून घरोघरी, दारात उंच गुढी उभारुन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. आता आपण ही गुढी उभारण्यामागच्या कारणाविषयी जाणून घेऊ.

ब्रम्हदेव, ज्याने अखिल सृष्टीची निर्मिती केली, त्यांनी ह्या चैत्र शुद्ध प्रतिप्रदेदिवशी सृष्टीरचनेस आरंभ केला असे मानले जाते. याच दिवशी रघुकुलनायक प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधिपती दृष्ट रावणाचा आणि इतर राक्षसांचा बिमोड करुन, त्यांना मारुन आणि वनवास संपवून पुन्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला. समस्त अयोध्यावासियांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत दारात ‘गुढ्या’, ‘तोरणं’ ऊभारुन आणि ‘रांगोळ्या’ काढून केले.

गौतमीपुत्र शातकर्णी उर्फ
शालिवाहन याने ह्या दिवशी ‘शक’ राजांचा युद्धात पराभव केला होता. या शालिवाहन राजाच्या काळात नवीन कालगणनेला सुरुवात झाली, ही कालगणना ‘शालिवाहन शक’ म्हणून ओळखली जाते. ह्या दिवसापासून ‘चैत्र नवरात्रीला’ सुरुवात होते. नवरात्रीत अनेक जण घरी घट बसवितात. या नवरात्रीमध्ये आदिमाता महिषासुरमर्दिनीची उपासना आणि पूजन करणे श्रेष्ठ मानले जाते. ‘रामनवमीला’ रामजन्म उत्सव साजरा केला जातो आणि सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. रामनवमीला अशुभाच्या नाशासाठी, आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या आशिर्वादाने माता कौसल्येच्या पोटी प्रभू ‘श्रीरामचंद्रांनी’ जन्म घेतला, ही नवरात्री ‘शुभंकरा नवरात्री’ म्हणून देखील ओळखली जाते. नववर्षाच्या सुरुवातीला ह्या तीनही सणांच्या त्रिवेणी संगमाने एक वेगळेच चैतन्य सकल सृष्टीत येते. वसंत ऋतूची चाहूल चैत्राच्या नवपालवीत अधिकाधिक भर टाकत असते. जणू सर्व निसर्गच नववर्षाचे स्वागत करायला नवीन वस्त्रे परिधान करुन तयार असतो.
गुढी
गुढी आणि पंचांग पूजन
गुढी म्हणजे ‘मांगल्याचे’, ‘विजयाचे’ आणि ‘आनंदाचे’ प्रतिक. गुढी उभारताना, एका उंच काठीच्या टोकाला स्वच्छ रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावर कडुलिंब आणि आंब्याची डहाळी बांधून त्यावर ‘तांब्या’ किंवा ‘चांदीचा’ गडू (कलश) उपडी ठेवला जातो. त्या गडूवर, कुंकवाने ‘ॐ’ किंवा ‘स्वस्तिक’ हे मंगल चिन्ह काढून गुढीला साखरेच्या गाठींची माळा आणि फुलांचा हार घातला जातो. त्यानंतर गुढी उभारायची जागा स्वच्छ करुन उंच गुढी उभारली जाते. मग हळद कुंकू, अक्षता व फुले वाहून गुढीची मनोभावे पुजा करण्यात येते व गुढी समोर दिवा ठेवून गुढीला नैवेद्य अर्पण केला जातो. आपली तसेच आपल्या प्रियजनांची भरभराट होऊन, त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुढी सारखे उत्तुंग यश मिळावे म्हणून साकडे घातले जाते. नंतर कडुलिंबाच्या पानांचा रसतीर्थ’ म्हणून प्राशन केला जातो. घरोघरी पंचपक्वानांचा बेत करुन देवाला गोड-धोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो.

शोभायात्रा - ढोल ताशा पथकं
जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक
गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने हा दिवस नवीन वस्तू, सुवर्ण खरेदी आणि नवीन कामकाज वा उद्योग सुरु करण्यासाठी खुप चांगला मानला जातो. गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी हिंदू संस्कृतीची जपणूक म्हणून शोभायात्रा काढल्या जातात. लेझीम, झांज, ध्वजपथकं ढोल ताशांच्या तालावर पावलं थिरकताना तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. लहान थोर सर्व जण पारंपारिक वेषात या शोभायात्रेत उत्साहाने सामिल होतात तर काही जण शिवाजीराजे, झाशीची राणी अशा अनेक शूर-वीरांचे पोशाख परिधान करुन यात्रेची शोभा वाढवीत असतात. तलवारबाजी, दांड्पट्टा, लाठीकाठी अश्या अनेक जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक या शोभायात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

शोभायात्रेत नटलेली मंडळी - १
शोभायात्रेत नटलेली मंडळी -
गुढीपाडवा सण हिंदू वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात, उत्साहात करुन देतो आणि संपूर्ण वर्ष आनंद साजरा करायला अनेक सण आणि उत्सवांची खैरात घेऊन योतो. आपण या प्रत्येकाने या सण आणि उत्सवात प्रेमाने सहभाग घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीची आणि मुल्यांची जपणूक केलीच पाहीजे.

0 comments:

Post a Comment