Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:32 PM | No comments

सेल्फी

काही दिवसांपूर्वी आम्ही शाळेतील वर्गमित्र बर्‍याच वर्षांनी भेटलो. निमित्त होते ‘वर्गमित्रांची reunion meeting’. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निघताना सर्वजण म्हणाले, "अरे आपण एवढ्या वर्षांनी भेटलो आहोत, एक फोटो तो बनता है." तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला, "आपण ‘सेल्फी’ घेऊया, म्हणजे सगळे जण एका फोटोमध्ये येऊ कोणीही फोटोत miss नाही होणार". त्या मित्राने त्याच्या स्मार्टफोनने झक्कासपैकी ‘सेल्फी’ काढला. त्या जुन्या सुखद आठवणी सोबत घेऊन आम्ही आपापल्या घरी गेलो. पण माझ्या डोक्यातून काही ह्या ‘सेल्फी’ चा विचार जात नव्हता.

त्याला कारणही तसेच आहे, आजकाल ‘सेल्फी’ काढताना खुप अपघात होतात. अश्या अपघातांच्या अनेक बातम्या आपण न्युज आणि वर्तमानपत्रातून ऐकत, वाचत असतो. अशी बातमी मनाला चटका लावून जाते. हल्लीच्या तरुणाईला ह्या ‘सेल्फीच्या’ नादाने अक्षरशः वेडावून सोडले आहे. अतिउत्साहापायी, काहीतरी वेगळं करुन फोटो काढण्याच्या नादापायी किंवा अन्य बर्‍याच कारणामुळे अनेक जण आपल्या मौल्यवान जीवास देखील मुकत आहेत. अगदी प्रत्येकाला आपला फोटो काढायला हे आवडतचं. आपण स्वतः देखील त्या फोटोचा भाग असावं अस पण वाटतं, परंतु जर ‘सेल्फी’ वा फोटो काढताना आपली काळजी घेतली तर अश्या अपघातांपासून आपण नक्कीच वाचू शकतो.

१. ‘सेल्फी’ वा फोटो काढताना नेहमी सभान राहीले पाहीजे. भान हरपून कधीही ‘सेल्फी’ काढू नये.
२. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच ‘सेल्फी’ वा फोटो काढावा.
३. स्वतःवर नियंत्रण ठेवावे, अतिउत्साहात काहीतरी वेगळं करायला जाऊन फोटो वा ‘सेल्फी’ काढू नये.
४. जिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे तिथे कधीही फोटो काढू नये.
५. आपल्यावर किंवा इतरांवर आलेल्या संकटाच्यावेळी किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी ‘सेल्फी’ न काढता प्रथम आपला जीव वाचवावा, तसेच इतरांना मदत करावी.
६. ‘सेल्फी’ वा फोटो काढताना पावित्र्याचा भंग होईल असे कोणताही फोटो काढू नये.
७. एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा फोटो घेताना तिथल्या व्यक्तींची पूर्व परवानगी घ्यावी मगच फोटो काढावा.

त्यादिवशी एक जाहीरात बघितली, एक व्यक्ती साधारण बाराव्या मजल्यावरुन पडत आहे आणि दहाव्या मजल्या वरील व्यक्ती त्याच्या गॅलरीत उभा राहून त्याच्या मदतीला न जाता पडतानाचा फोटो काढत आहे. दरम्यानं ती फोटो काढाणारी व्यक्ती फोटो काढण्यासाठी मागे-मागे जात असताना पाय सरकून थेट खाली पडणार आहे, तेव्हा त्या व्यक्तीला वाचवायला कोणीही नाही. तेव्हा आपण देखील जागरुक राहून आपली काळजी घेऊया व संकटात इतरांना मदत करुन आपले कर्तव्य नीट बजावूया. मला देखील फोटोग्राफीची खुप आवड आहे, पण वरील गोष्टींची काळजी मी घेत असतो. देवाने आपल्याला जे आयुष्य दिले आहे हे खूप अनमोल आहे, ‘सेल्फीच्या’ नादापायी आपण ते फुकट घालवता कामा नये. तेव्हा "Please don't loose self while taking selfie"

काल म्हणजेच दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ रोजी आसाम गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम येथे 'दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा' दिमाखदार उत्घाटन सोहळा पार पडला. जवळपास पाऊणे दोन तास चाललेल्या ह्या उत्घाटन सोहळ्यात भारताच्या पूर्व भागातील सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेची झलक सादर करण्यात आली. ह्या स्पर्धा जवळपास १२ दिवस गुवाहाटी आणि शिलाँग येथे एकाचवेळी चालणार आहेत.

आता आपण थोडसं ह्या स्पर्धेविषयी जाणून घेऊया. साधारणपणे सन १९८४ रोजी ह्या स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा द्विवार्षिक म्हणजेच दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी स्पर्धा ‘सैग’ ह्या नावाने देखील ओळखली जाते. सन १९८३ साली स्थापन झालेली दक्षिण आशियाई खेळ परिषद ह्या स्पर्धेचे आयोजन करते. आशियातील अफगाणिस्तान, नेपाल, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, भूटान, मालदीव आणि श्रीलंका हे आठ देश ह्या परिषदेचे सदस्य आहेत. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणारा लहान गेंडा ''शांति, प्रगति आणि समृद्धिसाठी खेळा...'' हा संदेश देतो आहे.



यंदा ह्या स्पर्धेचे १२ वर्ष आहे, आणि भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या देशांचे मिळून एकंदर २६०० खेळाडू सहभागी झाले आहेत. बॅटमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती सारख्या एकंदर २३ खेळांतील २२८ विविध प्रकारात स्पर्धा होणार असून; २२८ सुवर्ण, २२८ रौप्य आणि ३०८ कांस्य पदकांसाठी खेळाडूंमध्ये चुरस असणार आहे. भारताचे सर्वात जास्त म्हणजेच ५२१ जणांचे पथक सहभागी झाले आहे, आणि त्यात २४५ खेळाडूंचा समावेश आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे सलग ११ वर्ष भारत ह्या स्पर्धेच्या पदक तालीकेत अव्वल क्रमांकावर राहीला आहे. काल दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पार पडलेल्या संचलन सोहळ्यात प्रत्येक देश आपापल्या देशातील नदीचे पाणी सोबत घेऊन आले होते, आणि दक्षिण आशियाई देशांची एकजूट म्हणून हे पाणी 'ब्रम्हपुत्रा' नदीत विसर्जित करण्यात येणार होते.

खरचं, खेळ हा मनावर आलेल्या मरगळीचे रुपांतर 'उत्साहात' करतो. लहान असो वा मोठा प्रत्येकाला खेळायला आवडतेच. कारण खेळाला भाषा किंवा इतर कोणत्याही सीमेचे बंधन नाही. मनावर असलेला त्राण खेळल्याने काही वेळ का होई ना निघून जातो, मन मोकळं करुन जातो. खेळात हार-जीत तर होतचं असते, खिलाडूवृत्तीने आपल्याला आपली हार-जीत स्विकारता आली पाहीजे. खेळ आपल्याला संघभावना, समन्वय, चिकाटी, श्रम, सातत्य अश्या अनेक गोष्टी शिकवून जातो. खेळ हे आजच्या धकाधकीच्या जमान्यात 'औषध' बनत चालले आहे.

ह्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू आपले नाणे खणखणित वाजवून, ब्राझिल मध्ये होणार्‍या रिओ ऑलिंपिक मध्ये भारताचे नेतृत्व करुन पदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतीलच. चला तर, मग आपणही भारताला स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देऊन ह्या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटुया.