Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:30 PM | 6 comments

ले पंगा - कबड्डी

जच्या यंगबिग्रेड मध्ये ‘ले पंगा’, ‘घे ऊचल’, हे शब्द हमखास ऐकायला मिळतात. त्याचे कारणही तसेच आहे... 'प्रो-कबड्डी लिग'. ह्या 'प्रो-कबड्डी लिग' ला आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन, एशियन कबड्डी फेडरेशन आणि ऐमचुर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ह्यांचे समर्थन देखील आहे. आजच्या Quick जमान्यात भारतात Cricket T20, Football पाठोपाठ आता कबड्डीनेही सर्वांच्या मनावर ‘लोण’ चढवायला सुरुवात केली आहे. झटपट निकाल लागणार्‍या ह्या कबड्डी सामन्यांनी तरुणाईच्या मनावर गारुड करायला सुरुवात केली आहे. 'प्रो-कबड्डी लिग' च्या जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये आपल्याला कमालीची चुरस बघायला मिळत आहे. 'प्रो-कबड्डी लिग' ने मातीत खेळल्या जाणार्‍या ह्या अस्सल रांगड्या खेळाला आता Professional Level वर आणून ठेवले आहे, आणि भारतातील लहान गावांतून आलेले अनेक खेळाडू ह्या खेळातून आपली चमक दाखवित आहेत. तसेच हे खेळाडू Professional पणे खेळून त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय देखील मिळवून घेत आहेत.

राहूल चौधरी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक स्विकारताना
तसे बघायला गेलो तर भारतात कबड्डीचा इतिहास खुप जुना आहे. जुन्या ग्रंथांमध्ये देखील कबड्डीचा उल्लेख आढळून येतो. भारतात मूळ उगम असलेल्या ह्या खेळाने International Level पर्यंत मजल मारली आहे. त्याकाळी हुतुतु ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळ आता कबड्डी म्हणून नावारुपाला येत आहे. ७ खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या संघात 'चढाई' करणारे (Raider), 'बचाव' करणारे (Defender) आणि 'अष्टपैलू' (All-Rounder) असे सर्व प्रकारचे खेळाडू असतात. आता पर्यंत झालेल्या सर्व कबड्डी वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष व महिलांचा संघ अजिंक्य ठरला आहे. भारत ह्या खेळात जागतीक स्तरावर तर अव्व्ल आहेच, पण प्रो-कबड्डी लिगमुळे ह्या खेळाची जादू केवळ भारतापुरतीच मर्यादित न राहता परदेशातही पोहोचली आहे. परदेशातील काही खेळाडू ह्या प्रो-कबड्डी लिग मध्ये केवळ सहभागी झालेले नाहीत, तर सामन्यांमधे चांगली कामगिरी करुन आपली छाप पाडत आहेत. भारतातील लहान-लहान गावांतून आलेले अनेक भारतीय खेळाडू देखील इथे उत्तम कामगिरी बजावत आहेत. संघशक्ती, समन्वय, निर्णयशक्ती, आत्मविश्वास, ताकद आणि चपळता वाढविणारा हा खेळ दिवसागणिक कमालीचा लोकप्रिय होत आहे.

प्रो कबड्डी लीग सामन्यातील एक सुरशीचा क्षण

कबड्डीचा सामन्यांचे साधारण दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

१. मैदानी सामने
२. मॅटवर खेळले जाणारे सामने

मैदानी कबड्डी

साधारण ६० ते ९० दशकांमधे मुंबईत अनेक ठिकाणी कबड्डीच्या मैदानी सामन्यांचे आयोजन केले जात असे. लहापणी मी देखील कबड्डीचे सामने बघायला जात असे. शाळेत असताना कबड्डी खेळण्याची संधी मला मिळाली होती. परंतु आता मैदानी सामन्याची जागा ही मॅट सामन्यांनी घेतली आहे. परंतु तीच चुरस, तोच जोश आणि उत्साह तिळमात्र देखील कमी झालेला नाही.

वर्ल्डकप विजेता भारतीय संघ

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बापू त्यांच्या शालेय जीवनात ह्या खेळात कमालीचे हुशार होते. बापूंचे मित्र श्रीपती पाटील त्यांचा आंतरशालेय ‘हिंद करंडक’ स्पर्धेतील अंतिम सामन्या दरम्यानचा किस्सा सांगतात की, बापू हे शिरोडकर हायस्कूलच्या कबड्डी संघातील महत्वाचा खेळाडू होते. आणि बापूंनी त्यांच्या सर्विसच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चाखायला लावली होती, आणि शिरोडकर शाळेला ‘हिंद करंडक’ पटकावून दिला होता. आता बापूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपासना केद्रांवर ‘अनिरुद्धाज्‌ इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स्‌ ऍन्ड बोन्साय स्पोर्ट्स्‌’ हा उपक्रम सुरु आहे. अनेक नवे-जुने, सर्व जण खेळू शकतील असे खेळ आपण ह्या इन्स्टिट्युट मध्ये विनामूल्य खेळू शकतो. तसेच आपल्याला माहित असणारे इतर खेळ व ते खेळ खेळायच्या नवनवीन कल्पना इथे शेअर करु शकतो.


प्रो कबड्डी लीग सामन्यातील एक सुरशीचा क्षण


मागच्या वर्षी ह्या प्रो-कबड्डी लिग मध्ये माझ्या आवडत्या मुंबईच्या ‘युमुंबा’ संघाने उत्कृष्ट खेळ करित अव्वल क्रमांक पटकाविला होता. यंदा ही स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० जानेवारी २०१६ पासून सुरु होणार्‍या प्रो-कबड्डी लिग मध्ये ह्यावर्षी देखील युमुंबा विजेती ठरेल असा जाणकारांचा अंदाज आहे, कारण युमुंबा संघ हा सर्व बाजूंनी समतोल आहे. प्रो-कबड्डी लिग मध्ये भाग घेणार्‍या सर्व संघाना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.
प्रो कबड्डी लीग
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:58 PM | 2 comments

नातं

नातं जपावं... नातं फुलवावं...
प्रेमानं आपल्या... आपलं नातं बहरावं...

खुप वेळा आपण ऐकतो "नातं हे टिकवता आलं पाहिजे" पण मला असं वाटतं की, ‘नातं’ टिकवण्यापेक्षा नातं जपलं गेलं पाहिजे. आपण वस्तू टिकवतो, पण त्या देखील आयुष्यभर राहतीलच असे नाही. कालांतराने त्यापण विरुन जातात, त्यांना जाळी लागते, त्या जीर्ण होतात आणि मग त्या संपुष्टातही येतात. पण जपलेल्या गोष्टी म्हणजेच ‘सुखद आठवणी’ ह्या आयुष्यभर साथ देतात. सुख-दु:खांमध्ये आधार देतात. म्हणूनच ‘नाती’ ही जपली गेली पाहिजे.



अनेकदा आपण पाहतो की, छोट्या छोट्या गोष्टींवरुन नात्या-नात्यांमध्ये गैरसमज, गैरसमजांतून वाद आणि त्या वादांचे रुपांतर मग भांडणात होते आणि त्या नात्याला पूर्णविराम मिळतो. वाद होणे काही चुकीचे नाही, आपण सामान्य माणसं आहोत. कोणीही व्यक्ती पूर्णपणे बरोबर किंवा चुकीची नसते. पण घरा-घरांत होणार्‍या लहान-सहान वादांमुळे कायमचे तुटणारे बंध मात्र मनाला कायमची टोचणी लावून जातात. "घरोघरी मातीच्या चुली" असे म्हणतात हे चुकीचे नाही. नात्याला पुर्णविराम देण्यापेक्षा तिथे एक स्वल्पविराम द्यावा आणि तेच नाते पुढे चिरकाल टिकवावे. ज्याप्रमाणे रबर दोन्ही बाजूंनी ताणला तर तुटतो, अगदी त्याचप्रमाणे नात्यांचे देखील आहे. एकाने तरी नमती बाजू घेतली की नातं जपण्यास आपसूकच मदत होते. आपल्याला अनेकदा खुप राग येतो आणि मनात नसताना देखील रागाच्या भरात आपण काहीतरी चुकीचे बोलून जातो, पण काही वेळाने आपल्याला आपण ती केलेली गोष्ट चुकीची वाटते आणि मग पश्चाताप होऊन, आपण उगीच एवढे चिडलो असे देखील वाटते.





कुटुंबामध्ये एकत्र राहत असो वा नसो कुठेतरी काहीतरी बिनसतेच. पण ही ‘सलं’ मनात न ठेवता पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नात्यातील सेतू बांधावा आणि संसाररुपी सागरातून आपली नौका तारुन न्यावी. कोणीही Perfect नसतेच, लहान मोठ्या चुका ह्या प्रत्येकाकडून होतच असतात. मग ह्याच चुका मनात ठेवून नाते तोडणे किती योग्य आहे?


देव सुद्धा आपल्या चुका पदरात घालतोच नां? मग आपण सामान्य माणसे का बरे एवढी अडून बसतो? जर समोरची व्यक्ती चुकली असेल आणि त्या व्यक्तीला आपल्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर आपणसुद्धा एक पाऊल मागे घेण्यात काय हरकत आहे? क्षमा मागण्याने किंवा क्षमा करण्याने कोणीही लहान-मोठा होत नसतो. देवाने आपल्याला दिलेल्या सुंदर आयुष्यामध्ये वाद-विवादांचे बांडगूळ ठेवण्यापेक्षा प्रेमाचा वटवृक्ष लावून तो सतत बहरत ठेवला पाहीजे, मग त्याच्या सावलीत जगण्याची खरी मजा आहे.


 

प्रेम द्या आणि प्रेम घ्या... अहंकार, राग, रुसवे-फ़ुगवे, वाद मैलोनमैल लांब ठेवले पाहीजे. जीभेवर जर गोडवा असेल तर सारे जीवनच मधुर होईल नां. धारदार शब्दांपेक्षा आधार देणारे शब्द वापरावे आणि नाती प्रेमाने फुलवावे. आपले आयुष्य खुपच लहान आहे, आपण ते प्रेम वाटण्यात घालवले पाहीजे. नाते जपण्यासाठी एकमेकांचे गुण-दोष स्विकारुन नाते जपले पाहीजे. एकमेकांबद्द्ल वाटणारी आत्मियता कधीच कमी होऊ देता कामा नये. कारण नाते हे काचे सारखे आहे ते तुटण्यापासून जपावे.



नाते जुळले मानाशी मनाचे...

आता हे झाले मानवी पातळीवर. आध्यात्मिक पातळीवर देखील नातं जपणं हे खुप महत्वाचे आहे. अकारण कारुण्याचा सागर असलेला तो भगवंत कोणाशीही असलेले त्याचे नाते कधीच तोडत नाही, कारण तो कधीच कोणाला विसरत नाही आणि त्याने दिलेला शब्द हा ‘तो’ पाळतोच. ‘तो’ क्षमावंत भगवंत आपल्याला वारंवार ‘संधी’ देतच राहतो, पण आपणच ‘त्याच्या’ पासून लांब पळत राहतो.


जनम जनम का नाता है तेरा मेरा... याद रहा प्रभू तूम को मैं भूला बिसरा


त्या दिवशी वाचनात खुप छान वाक्य आले,


माझ्या देवाचे आणि माझे नाते हे वेगळेच आहे. दिवसाच्या शेवटी ‘तो’ ही विसरतो आणि मी ही, मी केलेल्या चुका

परमपूज्य बापूंनी आपल्याला मागचे वर्ष हे प्रेम वाटायचे वर्ष आहे असे सांगितले होते, आणि हे वर्ष हे नियमित भक्ती करण्याचे व वाढविण्याचे वर्ष आहे असे सांगितले आहे. नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले आहे, आणि प्रत्येक जण नवीन वर्षात नवनवीन संकल्प करतोच. चला मग आपण देखील संकल्प करुया की, प्रेम वाटून मानवी पातळीवर आपण एकमेकांशी नातं जपू तसेच नियमित न चुकता जास्तीत उपासना करुन भगवंताशी असणारे आपले नाते जपूया आणि ते अधिकाधिक घट्ट करुया.